सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

स्वारी लिंगाण्याची ………………… भाग २.




थंडी पासून वाचण्याचा केलेला नाहक प्रयत्न 

संपूर्ण रात्र थंडीत कुडकुडत गेली होती सकाळची चाहूल लागली तसे परिस्थितीचा अंदाज घ्यायला बाहेर पाडूया म्हणून निघालो गुहेतून जर खाली आलो आणि उलट्या पावली परत आलो. रात्रभर जिकडून आम्ही धडाधड चालत होतो तिकडे पाय ठेवायला अगदी नावापुरती जागा होती आणि बाजूला होती हजार फुट खोल दरी. म्हंटले "अरे काल आपण इकडूनच आलो ना? इस्पोजर आता आपले काम करत होता. थोडे सावरत बाहेर आलो तर सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणी तरी बोलले "दीपकला पकडा रे नाही तर उडून जायेल तो." मागून स्वप्नाची इंट्री झाली इथून पुढे ती जी काही सुटली होती जणू कालची अमावस्या तीला भोवली की काय असे वाटू लागले होते. साधारण ८ वाजत आले असतील पुन्हा सेटप लावला आणि खाली उतरायला सुरवात केली.

सेटप करताना एकदम खाली सुधीर मध्ये कल्पेश, दीपक आणि बसलेले स्वप्ना, अजय 

आम्ही चौघे आधी खाली उतरलो सुधीर आणि दीपक ला उशीर होत होता. लावलेला दोर पुन्हा काढून पण आणायचा होताच त्या करता ते U मारून खाली उतरत होते मध्ये एकदा रोप अडकला देखील त्यामुळे त्यांना पुन्हा चढाई करावी लागली होती.

दीपक आणि सुधीर 

खाली आलो मागोमाग अजय आला त्या म्हंटले खाली तू आधी खाली जा आणि बॅग सोडव आधी आम्ही काल सुरवात केली तेव्हा सगळ्यांच्या बॅग खाली एका झाडाला बांधून ठेवल्या होत्या. आधी खायला शोधले एक बिस्कीटचे पाकीट मिळाले त्यात प्रत्येकी ४ अश्या हिशोबाने वाटणी केली. एकट्याचा विचार करून चालणार नव्हताच सगळ्यांना उपवास घडत होता. साधारण १० वाजले सगळ्यांना बेसला जमायला. स्वप्नाने काल आणलेल्या काल ??? नाही परवा आणलेल्या तूप पोळ्या ह्याची आस होती पण त्या हि खराब झाल्या होत्या. म्हणजे खायला आता काहीच नव्हते. अजयने बदामचे एक पाकीट काढले, माझ्या कडे मुगडाळ होती. पाणी होते साधारण ५ लिटर आणि त्यात मिक्स करायला TANG (इस मै फ्रुट है). पाणी खाली पान्हे गावात पोहोचे पर्यंत पुरवायचे होते. स्वप्ना ने हायड्र-पॅक मध्ये पाणी भरून घेतले आणि कल्पेशने बाकी सगळ्या पाण्यात TANG मिक्स करून टाकले.  

लिंगाण्याच्या बेस ला उरलेल्या सुर्लेल्या खाण्यावर ताव मारताना 

आता पान्हे गावात जायची वाटचाल सुरु झाली. उजव्या दिशेला दिसणाऱ्या पाऊलवाटेने खाली उतरायला सुरवात केली. थोडे खाली आलो आणि समोर दोन रस्ते लागले कोणाचे एकमत होईना. दीपक, कल्पेश, सुधीर वेगवेगळ्या दिशांना गेले साधारण तास दीडतास ह्यात गेला असेल पण रस्ता काही केल्या सापडेना मग पुन्हा माघारी बेसला जायचे ठरले. पुन्हा बेसला आलो आता डावीकडची अंधुक दिसणारी वाट पडताळून पाहायची वेळ माझी होती. सुधीर माझ्या मागे काही अंतरावर दिसत होता मला पण वाट न सापडल्याने आम्ही पुन्हा मागे आलो. आता एक मार्ग होता कि पुन्हा आलो तसे मागे जायचे मोहोरीला पण पुन्हा बोराट्याची नाळ चढूनवर जायचे त्राण कोणाच्याच अंगात नव्हते. परत मोठा प्रश्न हा होता ती तिथून पुढे काय? काल वेल्हे गावातून आम्हाला गाडीवाल्याने सरळ मोहरी गावापर्यंत सोडल्यामुळे आमचा साधारण ९ किलोमीटर चालण्याचा त्रास वाचला होता पण ती वाहतूक खाजगी होती त्याची सतत त्या मार्गावर ये जा नसते. म्हणजे आम्हाला वरोती गाव पर्यंत पायपीट करावी लागणार होती तिकडे जाऊन सुद्धा पुढच्या प्रवास साठी किती वात पहावी लागेल हे माहित नव्हतेच. सगळ्यांचा ह्याला नकारच आला. आता उपयोगी आला जितेन(दादा) पाटील कोणत्याही ट्रेकला जाण्यापूर्वी त्याच्या भावोतालच्या परिसराची जास्तीत जास्त माहिती जमा कराची त्याला सवय, त्यानेच पाठवलेल्या पुस्तकातील पानांचे फोटो सुधीरच्या मोबाईलमध्ये होते. तो लेख नीट वाचला आणि समजले कि बोराट्याची नाळ सरळ खाली उतरत गेलो तर दापोलीला पोहोचणार होतो. तिकडून महाडला जायची काही तरी सोय करता येणार होती. बस ठरले मग कुठेच नाही थांबायचे सरळ खाली उतरुया. पुन्हा बॅग खांद्यावर घेतल्या उरली-सुरली सगळी ताकद एकवट केली आणि पुढे निघालो. बोराट्याच्या नाळेचा ट्रॅवर्स पूर्ण करून आम्ही खाली उतरायला लागलो.


बोराट्याची नाळ सुरवात लिंगाण्याकडून 

बोराट्याची नाळ सुरवात मोहोरी वरून  

नाळेतून खाली उतरायला सुरवात केली. मोठाले दगड उतरताना पाठीवरचे वजन आता डोईजड झाले होते. पण थांबून चालणार नव्हते. सगळ्यात पुढे मी चालत होतो. मनाला एकाच भीती वाटत होती जर का मध्ये कुठे Rappelling करावी लागली किंवा पाण्याचे मोठे तळे लागले तर काय? त्यात वेळ वाया जाणार होता.

बघताय काय रागाने बॅग घेतली आहे हिरकणीने

         खाली उतरत होतो दुपारचे तीन वाजले होते. आता भूक आणि तहान अनावर होऊ लागली होती. रात्री खाल्लेले एक सफरचंद तोच काय तो मोठा आहार पोटात गेला होता. काही तरी अचानक लक्षात येउन मी तिकडेच थबकलो. मागे कल्पेश होता "काय रे काय झाले!" मी पाठीवरची बॅग लगबगीत खाली टाकली आणि  उघडायला लागलो. "काय शोधतोस आहे" कल्पेश. थोडे फार वाचकरले आणि चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य आले "कल्प्या मॅग्गी आहे थोडी उरलेली" सगळ्यांना पुरेल इतकी नव्हती पण बुडत्याला काडीचा आधार. आजूबाजूला पाहणी केली (चुकून मधमाश्यांचे पोळे असेल तर …) आणि लगेच चूल पेटवली. आता सगळ्यात मोठा प्रश्न आला पाणी कुठे आहे. कारण शिल्लक पाणी स्वप्नाच्या हायड्र-पॅकमध्ये आणि उरलेल्या पाण्यात कल्पेशने TANG मिक्स करून टाकले होते. भूक तर तडकून लागली होती इतकी की, आम्ही त्या TANG च्या पाण्यात सुद्धा मॅग्गी बनवून खायला तयार होतो. चूल पेटवली माझ्याकडे थोडे पाणी होते आणि स्वप्नाकडे असलेले ह्यात मॅग्गी बनवायला घेतली. मॅग्गी तयार झाली, त्या थोड्या थोडक्या खाण्याला पंचपक्वान्याचा खमंग सुवास येत होता. तो पहिला गरमा गरम घास जिभेवरून घश्यात आणि मग उदरात कुठे तरी उतरला तो स्वाद आयुष्यभर जिभेवर राहणारा होता. त्या खाण्यात सर्वस्वाची आणि मनाची तृप्ती मात्र झाली……… त्या क्षणी एक गोष्ट मनात घर करून गेली ती म्हणजे सगळे उपाशी होतो ह्याचे साऱ्यांना भान होते आणि एरवी खाण्यावर तुटून पडणारे आज मात्र सगळ्यांना वाटणी समान मिळेल हे पाहत होते. स्वप्नाचा जोश काही केल्या कमी झाला नव्हता त्यात खायला मिळाले आणि  "तु मेरे अगल बगल है …", "चल धतींग नाच",  ह्या गाण्यांचा मारा चालू झाला. पोटाला मिळालेल्या खाण्यापेक्षा गरमा गरम खाण्याने शरीरात तरतरी आली. 

मेरी मॅग्गी टाईम

खाऊन पुन्हा मार्गाला लागलो काहीसा पुढे आलो, एका दगड वरून खाली उडी मारली आणि जोरात ओरडलोच "लवकर या इकडे" समोर निर्मळं पाण्याचा झरा वाहत होता. तसाच खाली बसलो बाटली न भरता वाहत्या झऱ्यातून डायरेक्ट तोंड लाऊन पाणी प्यायलो. पाणी जवळ जवळ संपलेच होते आमच्या कडचे तिथे सगळ्यांनी बाटल्या पुन्हा भरल्या. पण तिथून पुढे मात्र मुबलक प्रमाणात पाणी होते.




पुढची वाटचाल चालू होती आणि ज्याची सगळ्यात जास्त चिंता होती तीच गोष्ट समोर आली. समोर साधारण ८-१० फुट उंचीचा कातळ. चढून जाताना त्याचे रूप वेगळे पण उतरताना …………. आता काय करायचे rappelling? सुधीरने रोप लावला. मी म्हटले थांब, मी मारतो उडी त्याने ताबडतोब नकार दिला. कारण आता जर कोणाला लागले तर पुढे काय!! हा मोठा प्रश्न होता. मग मी रोपला धरून कसा तरी उतरलो (जवळपास उडीच मारली होती) सगळ्या बॅग खाली घेतल्या आणि मग एक एकाला सरळ खांद्यावर घेऊन खाली उतरवले. थोडा फार काय तो वेळ वाचवून चालयला लागलो अजून काही केल्या गाव दिसत नव्हते. सायंकाळचे ५ वाजत आले होते आता मी दीपक आणि अजय बरेच पुढे निघून आलो होतो. स्वप्ना, सुधीर आणि कल्पेश मागे राहिले होते. पायात गोळे आल्याने त्यांचा वेग काहीसा मंदावला होता साहजिकच होते ते म्हणा पाठीवरचे ओझे आणि त्यात पोटात काही नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडताना अंघोळ केली होती आता त्याला ३ दिवस झाले होते. अश्यातच समोर नदीचे नितळ-शांत पात्र लागले मग काय होते मी आणि दीपक ने मनोसोक्त बुडून घेतले. तयारी केली आता अंधार व्हायला लागला होता पुढे कुठे हे अजून देखील समजले नव्हते. सगळे एकत्रच चालणार हे ठरले. आता कृत्रिम मशालींच्या प्रकाशात पुढची वाटचाल एकत्र पणे चालूच ठेवली पूर्ण २ दिवस झाले होते आम्ही फक्त ६ जण एकमेकांना दिसत होतो त्या व्यतिरिक्त संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. शेताच्या वाटेत चालत असताना गाई-म्हशींचा एक कळप नजरेस आला. ह्याचा अर्थ गाव जवळपासच आहे. इतक्यात समोरून एक प्रकाश येताना दिसला सरळ त्या दिशेला चालत सुटलो पावलात जोर आला होता आजूबाजूच्या झाडा झुडपांचे लागणारे काटे त्याचेही भान नव्हते राहिले. प्रकाश जवळ जवळ येत होता आणि आवाज आला

गावकरी: - "अरे कोण आहे रे?"

आम्ही: - "काका गावात कुठून जायचे!"

गावकरी:- "नदीपलीकडे जा तिकडून"

त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आम्ही चालू लागलो पावले झपाझप पडत होती पाचच मिनिटे चाललो असू आणि गावत शिरलो समोरच मुलांचे एक टोळके दिसले त्यांना गावाचे नाव विचारले म्हणाले "दापोली"

आम्ही: - “गावात कोणाकडे गाडी मिळेल काय महाड पर्यंत जायला"

गावतील मुले: - पुढे तुकाराम गायकवाड राहतात त्यांच्याकडे गाडी आहे.
त्यांच्या घरा समोर आलो आणि त्यांना विचारले "आम्हाला महाड पर्यंत सोडलं काय मुंबईला जायचे आहे."
होकार मिळाला तशी थोडी उसंत मिळाली, इतका वेळ माझी बॅग मी अजयला दिली होती त्याची पुन्हा अदलाबदली केली. अर्थातच गावात एवढ्या मोठ्या बॅग घेऊन पाहुणे आले कुठून ह्याची चौकशी झाली आणि तुकाराम काक म्हणाले "काल तुम्हीच गडावर होतात काय?" ह्या प्रश्नाचे उत्तर देताना स्वतःचा आणि साथीदारांचा अभिमानाच वाटला. थोडे फार फ्रेश झालो आता निघायची तयारी केली. गाडी म्हणून टेम्पो होता त्यात बसायला सीट नव्हत्या त्यामुळे मागे चटईवर बसावे लागणार होते. बॅग ठेवल्या आणि सगळे बसलो.
  

गावातल्या मुलांच्या बोलण्यावरून समजले ते सुद्धा कधी वर पर्यंत गेले नाहीत. त्यांनी विचारले "तो झेंडा तुम्ही लावलात काय?" आम्ही: - नाही. आम्ही नाही लावला. धनत्रयोदशीला लिंगाण्यावर अरुण सावंत, प्रांजल वाघ अश्या १६ जणांच्या टीमने वरती मशालीचा जागर केला होता त्यांनीच मोठा भगवा देखील फडकवला होता. तो प्रशस्थ भगवा पार दूर दापोली वरून देखील दिसत होता.  

भगवा आमचा झेंडा , भगवे आमचे रक्त
प्राण देउनि राखितो, आम्ही स्वराज्याचे तख्त,
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त,
आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त.

महाराष्ट्राच्या मातीसाठी (स्वराज्यासाठी) सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून क्षणाचीही उसंत न घेता रात्रीचा दिवस करणाऱ्या महाराजांना आणि सगळ्या मावळ्यांना अभिवादन करून परतीचा प्रवास सुरु केला.

आज कित्तेक वर्षे लोटली पण हा गड फार मोजक्याच लोकांना सर करता आला आहे. त्यात आम्हा सहा जणांची नावे जोडली गेली आहेत. टेम्पो मध्ये मागे बसलेलो असताना गुडूप अंधारात सुद्धा स्वतःचे रौद्र रूप जसेच्या तसे दाखवणाऱ्या लिंगाण्याला आम्ही शांत पण पाहत होतो.
          
लिंगाण्याचे निघताना टिपलेले छायाचित्र दापोली गावातून
             डुलतडुलत आम्ही रात्री १० वाजता महाड बस स्थानका जवळ आलो. लागलीच जाऊन मुंबईला जाणाऱ्या बसची चौकशी केली १० मिनिटात बस सुटणार होती. कोणीतरी म्हणाले "सोडा ती बस दर तासाला असतात आधी जेवायचे बघा!!!" समोरच एक हॉटेल होते त्यांना विचारले सोमवार होता तरी सुधीर सोडून सगळ्यांनी चिकन थाळीची ऑडर्र दिली. जेवण पुढ्यात येई पर्यंत मस्ती काही कमी झाली नव्हती. मिळालेल्या यशाला वंदन करून पोटभर जेवण केले. पुन्हा समोरच्या बस स्थानकात आलो आणि मुंबईच्या बसची विचारणा केली, साधारण २० मिनिटांनी बस आली आणि नशिबाने बसायला जागा देखील मिळाली. परतीचा प्रवास सुरु झाला, आता शांत झोपायला हरकत नव्हती.

मनात एक वेगळीच शांती जाणवत होती आता पुन्हा सुरवातीपासून सगळे आठवायला लागले. तीन दिवसापूर्वी (सुधीर,अजय,कल्पेश,स्वप्ना,दीपक,आणि मी) आम्ही सहा जण ह्या पराक्रमासाठी घर बाहेर पडलो. तेव्हा दिवस होता २ नोव्हेंबर २०१३ दिवाळीचा पहिला दिवस, माझा प्रवास पहाटेच्या २.३० वाजताच सुरु झाला. घरी एक फटका फोडला आणि अभ्यंगस्नान करून ३.४० ची लोकल पकडली, सगळ्यांनी दादरला भेटायचे हे ठरले होते. सणा-सुदी घराबाहेर चाललो होतो म्हणून आई जरा नाराज होतीच. पण रात्री उठून तिने आम्हाला जेवणासाठी डब्बा मात्र बनवून दिला होता. ६ जणांना पुरतील एवढ्या चपात्या आणि भाजी ती शिदोरी आमचा शनिवार रात्रीचा डिनर होता. सकाळी गाडीत फुलवाल्यांची गर्दी असते त्यात झोप डोळ्यावर दादर आले तसा त्यांच्या गोंगाटामुळे खडबडून जागा झालो आणि लगेच बॅग सांभाळत खाली उतरलो काही राहिले तर नाही हे पहायच्या आता गाडीने आगे कूच केली होती. नंतर लक्षात आले अरे जेवणाचा डब्बा राहिलाच गरम होता म्हणून तो बॅगमध्ये न ठेवता पिशवीत ठेवला होता. स्वामीनारायण मंदिराजवळ सगळे भेटलो. त्यांना सांगितले तर सगळ्यांचे मत पडले कि पुण्यात काही सोय करूया आता. दादर वरून पुणे तिथून पुढे बसने वेल्हे असा प्रवास करायचा होता. इथून आम्हाला मस्त इंनोवा गाडी मिळाली A/C गाडीतून प्रवास म्हणजे गरीब ट्रेकर्सना न शोभणारे वर्तन होते. (रेग्युलर ट्रेक्स करणारे कमीत कमी खर्चात ट्रेक करू पाहतात.) साधारण ९ वाजता स्वारगेटला आलो. बस स्थानकात जाऊन वेल्हे जावात जायला बस आहे का ह्याची चौकशी केली. मास्तर म्हणाले वेल्हेच्या बस ला वेळ आहे गुंजवणे पकडा ती पण जाते. (पुण्यात आहोत हे विसरलोच होतो) वाहकाने स्पष्ट शब्दांत नकार दिला "गाडी तिकडे जाताच नाही म्हणत." त्याला म्हंटले "ते चौकशी खिडकीवाले म्हणाले जाते म्हणून" वाहक: - "गाडी मी चालवतो कि ते!" "मार्गासिनीला सोडतो तिकडून १३ किलोमीटर आहे." पुढची बस कितीला ते माहित नव्हते मग ह्य्नेच जायचा निर्णय घेतला. मार्गासिनी वरून एका टेम्पोवाल्या काकांनी मुबलक पैश्यात आम्हाला वेल्हेला सोडले. सकाळीच निघालो होतो, कोणी नाश्ता पण केला नव्हता. वेल्हे यायला ११ वाजले म्हणून इथेच काही खाऊया या अर्थे छोट्याश्या हॉटेलमध्ये गेलो. इथून पुढे आम्हाला वारुत्ती गावात जायचे होते तिकडून पुढे ७ ते ९ किलोमीटर चालत मोहोरी गावी जायचे होते. साधारण प्रवासाचा मार्ग मुंबई-पुणे-वेल्हे-वारुत्ती-मोहरी-बोरात्याची नाळ-लिंगाणा असा होता. गाडी वाल्यांशी बोलताना एक गृहस्थ मध्ये बोलून गेले "गाडी पार मोहरी पर्यंत जाते कि आता रस्ता बनवला आहे." पैश्यात उतार चढाव करून ते आम्हाला सोडायला तयार झाले आमचा चायचा त्रास बराच कमी होणार होता. पोटोबा झाला आणि आम्ही नवीन मार्गावर मार्गस्थ झालो. डोंगर फोडून बनवलेला रस्ता चांगलाच होता. गाडीचालू झाली आणि सुधीरला डुलकी लागली होती. कसे माहित नाही पण अचानक उठला आणि म्हणाला "काका गाडी थांबवा जरा" आता ह्याला काय झाले अजय म्हणाला काय रे बरे नाही का वाटत? सुधीर:- एवढ्या लांब आलो आहोत जरा फोरो काढूया ना!! एकाच हशा पिकला.  
                            

वेल्हे तो मोहोरी नवीन मार्ग आणि केलेली मस्ती शेवटी मोहोरी कडे जाताना

लिंगाण्याची पहिली झलक 

ह्या अनपेक्षितरित्या समोर आलेल्या माहितीमुळे आमचा खुपसा वेळ आणि एनर्जी वाचवायला मदत झाली. तासे मोहरीगाव अगदीच छोटेसे आहे साधारण १५ ते २० घरांचे गावात ओळख नव्हतीच आणि आम्ही कुठेही न थांबता तसेच पुढे चालत एका मोठाल्या झाडाखाली थांबलो. सगळे सामान वस्तू बाहेर काढल्या. टेक्निकल वस्तूंची मोजदाज आणि चेकिंग केली.

सेटप चे सामान चेक करताना मी आणि दीपक (फुल मस्ती मूड)

               सामानाची जुळवाजुळव चालू असतानाच अचानक नाकी ढोल-ताशांचे आवाज येऊ लागले आणि हा- हा म्हणतान लोकांची गर्दी व्हायला लागली. दीपक म्हणाला "अरे आपण येणार म्हणून एवढी जय्यत तयारी कोणी केली" साधारण शे-दोनशे माणसे जमा झाली. गावकऱ्यान कडे चौकशी केली असता समजले कि बलिप्रतिपदेला गावच्या देवीचा उत्सव असतो तोही दर तीन वर्षांनी. आमच्या लिंगाण्याच्यावारीला हा योग जुळून आला जणू अशीर्वादासाठीच.

जत्रेतील काही क्षण 

                 त्यातले काही जण मुंबईकडे राहणारेपण होते त्यांनी आम्हाला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण दिले. बळी म्हणून बोकड कापणार होते. परंतु आम्ही ठरवल्या प्रमाणे आज रात्रीच आपण लिंगाण्याच्या बेसला जाऊन राहूया असे ठरले आणि आम्ही पुढे निघालो. मोहोरीतून पुढे जाताना डाव्याबाजूच्या रस्त्याने गेल्यास सरळ बोराट्याच्या नाळेच्या मुखाशी पोहोचतो पण कसे कोण जाणे आम्ही उजव्याबाजूलाच चालत राहिलो आणि मागच्या बाजूने वळसा घालून रायलिंग पठारावर येई पर्यंत आम्हाला अंधाराचे पडसाद जाणवायला लागले म्हणून आम्ही आमचा देर तिकडेच मांडायचे ठरवले. मावळत्या सूर्याच्या भगव्या छटेमध्ये सजलेल्या लिंगाणाच्या रूप मनाला मोहून टाकत होते त्यामागे दूरवर दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड अहहाहः काय अप्रतिम नजरा होता तो. मनोसोक्त फोटो काढून झाले तसे सुधीर आणि कल्पेश बोराट्याच्या नळीचा रस्ता पाहायला गेले. आम्ही झोपायला जागा हेरून ठेवली आणि सो-कॉल्ड जेवणाची तयारी करायला लागलो.

रायलिंगी वरून दिसणारे लिंगाण्याचे मोहक रूप 

 डावीकडून अजय, मी - उभे, खाली स्वप्ना, दीपक, कल्पेश, सुधीर  
               
सकाळी धावपळीत ट्रेनमध्ये जेवण विसरून आलो आणि पुण्यातून इथवर उत्सुकतेमुळे आणि सुखकर प्रवासामुळे जास्तीचे खाणे घेतलेच नाही. म्हणून आता रात्रीला आम्ही     बनवायला घेतली आणि उतरवताना दीपकच्या हातून सांडल्यावर उरले सुरलेले खून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो.
कल्पेश: - "एक गोष्ट आहे उद्या सांगेन पण आता झोपा"
मी: - "म्हटले रात्रभर कशाला विचार करायला लावतोस आहे संग ना."
मग त्याने मागच्या दिशेने प्रकाशझोत टाकला तर तिकडे असणारे एक झुडूप नुमा झाड हुबेहूब माणसाच्या आकाराचे दिसत होते अंधारात तर त्याचा आकार एखाद्या बुजगावण्यासारखा वाटला. जणू कोणीतरी तिकडून आम्हाला पाहत आहे. मग ठरले कि आळी-पाळीने जागता पहारा द्यायचा.  सुधीर,कल्पेश आणि स्वप्ना झोपाय येत नाही म्हणून काही वेळ जगणार होते. रात्री सगळ्यात जास्त जागरण कोणी केले ह्याचा वाद आज देखील चालू आहेच. पण सुधीर कल्पेशने जास्त वेळ पहारा दिला होता. थंडी-वारा-पहाऱ्याचे जागरण ह्या सगळ्यात मोहिमेचा दिवस उजाडला.

बस ने मुंबई महामार्गावर भरधाव वेग धरला होता आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यावर मला झोप आवरणे कठीण होत होते आठवणींचा पेटारा अलगद बंद करून मी सुद्धा झोपी गेलो.   

पॅचवर रोप कॉईल करताना सुधीर आणि स्वप्ना 

 जेमतेम जागेमध्ये बसलेलो मी, दीपक आणि स्वप्ना 

हे दोघे संपूर्ण ट्रेक ची जान होते सतत हसत आणि मस्ती करत दीपक आणि स्वप्ना.


सुधीर Climb करताना

स्वप्ना Climb करताना खाली मी

सुधीरला आधी पुढे जाऊन द्यावे ह्यावर सगळ्यांचे एकमत होते. 
त्याची वाट बघताना  अजय, स्वप्ना आणि कल्पेश.

सेटप रेडी करताना सुधीर आणि कल्पेश


अजय नाचरे लिंगाण्याच्या टोकावर 
रायलिंगी पठार

ह्याच गुहेने रात्री आम्हाला आश्रय दिला होता.


यश मिळेल कि नाही ह्या पेक्षा ध्येय उराशी बाळगा आणि धाडसी पावले उचला. 


सुधीर: - Lead Climber आणि ट्रेकसाठी लागणारी सगळी तयारी आमच्या कडून करून घेतली होती.

दीपक: - बिलेमन म्हणून सुधीरला साथ देणार होता.

कल्पेश: - बॅकअप म्हणून

अजय, स्वप्ना, आणि मी.

प्रवासाचा मार्ग: - मुंबई (दादर)-पुणे-वेल्हे-मोहोरी-बोरट्याची नाळ-लिंगाणा.

           नुकताच प्रांजळ वाघ ह्यांचा लिंगाण्यावरील लेख प्रसिद्ध झाला होता त्यामुळे गडाबद्दलची परिस्थिती, प्राथमिक माहिती सुधीरने त्यांच्या कडून घेतली होती. मोठा आणि गहन प्रश्न होता जर कोणाला अपघात झालाच तर? त्या करिता विचलित न होता आधी बबन कडू(लिंगाण्या जवळच्या पान्हे गावातील एकमेव व्यक्ती ज्यांना गडावर जायचा अनुभव आहे), ह्यांना संपर्क साधायचा, त्यांच्याशी संपर्क नाही झाला तर मग मात्र सरळ मुंबईत प्रांजल वाघ आणि आनंदा गोवेकर हे सगळे जाण्याआधी विचारात घेतले होते. (त्याची गरजच नाही पडली हेच बरे झाले.)
                सकाळी चढाईला सुरवात करते वेळी बुटांची अडचण होत होती, म्हणून आम्ही ते काढून ठेवले आणि नकळत सुधीर, मी, कल्पेश आणि अजयने बेअर फुट लिंगाणा सर केला होता. (तेव्हा असे करायचे हे मनात नव्हते पण असे केले आहे ह्याची अनुभूती खाली आल्यावर झाली.)

NEXT COMING SOON......


३ टिप्पण्या:

  1. मस्त प्रीतम.... छान वाटले.... सुंदर लिहिले आहेस. बरोबरच्या फोटोंमुळे तुमचा प्रवास नेमका समोर उभा राहतो. आभार....

    उत्तर द्याहटवा
  2. Sunder Varnan.... good narrated ........... I wann do this with u means. V Rangers in Jan 2014

    उत्तर द्याहटवा